सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

 

वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण

संतोष देशमुख हत्या प्रकरण : तीन तास सुनावणी, पुढील सुनावणी ३० ऑगस्टला

शिरीष शिंदे (Shirish Shinde)

बीड : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात सोमवारी तीन तास चालली. या सुनावणीदरम्यान मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि दुसरा आरोपी विष्णू चाटे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला, ज्याला सरकारी पक्षाच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, आम्ही वाल्मीक कराडला जामीन का देऊ नये याची कारणे न्यायालयाला स्पष्ट केली, तसेच दुसऱ्या आरोपी विष्णू चाटेने 'माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही' या मागणीवर आम्ही अनेक पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

---

निकम यांनी मांडलेले मुद्दे :

अटकेच्या कारणांवर स्पष्टीकरण : कराडला अटक करताना कारणे सांगितली नव्हती, या मुद्द्यावर आम्ही कराडच्या सही असलेला दस्तऐवज सादर केला.

फोन रेकॉर्डिंगविषयी : सुनील शिंदेने केलेल्या फोन रेकॉर्डिंगबद्दल आम्ही सांगितले की, कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून फोन केल्याची नोंद आहे.

विष्णू चाटेची भूमिका : विष्णू चाटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याने खंडणी प्रकरणात कराडला कशी मदत केली, याकडेही आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधले.

---

आरोपींच्या वकिलांची भूमिका

वाल्मीक कराडचे वकील सत्यवृत्त जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. ते म्हणाले, "न्यायालयात जे काही मुद्दे मांडले आहेत, त्यावर भाष्य करता येणार नाही, ते कायद्याला आणि मर्यादेला धरून आहे."

---

धनंजय देशमुख यांचे गंभीर आरोप

मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, "हे मोठे जाळे असून ते तोडले पाहिजे. गुन्हेगारीच्या माध्यमातून अर्थकारण केले गेले आहे. आरोपींची एवढी मोठी दहशत होती की यंत्रणाच त्यांच्या नावावर चालायची." त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपींचे समर्थन करणाऱ्या लोकांना पदावर ठेवू नये, अशी मागणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरण : तीन तास सुनावणी, पुढील सुनावणी ३० ऑगस्टला शिरीष शिंदे  (Shirish...